मॅगसेसे पुरस्कारविजेत्या सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय यांनी अतिशय परखडपणे केलेल्या चिंतनामध्ये दोन समांतर प्रवास नोंदवले गेले आहेत. त्यात पन्नास वर्षांच्या सार्वजनिक कृतिशीलतेचा लेखाजोखा आहे आणि त्याच वेळी लेखिकेने विचारसरणीच्या पातळीवर केलेले निश्चय व्यवहारात उतरवण्याचा प्रयत्न कसा केला याचं व्यक्तिगत कथनही इथे नोंदवलेलं आहे.अरुणा रॉय गेली अनेक दशकं भारतातील ग्रामीण भागांत परिघावर जगणाऱ्या समुदायांच्या हितासाठी काम करत आल्या आहेत आणि त्यांच्याच सोबत राहत आल्या आहेत. बिकट वातावरणाला सामोरं जात टिकून राहण्याचा या समुदायांचा अधिकार शाबूत ठेवण्यासाठीच्या लढ्यामध्ये त्या सहभागी झाल्या. त्यामुळे असुरक्षित घटकांची दैन्यावस्था नोंदवत असताना त्या तळपातळीवरील सामाजिक चळवळींच्या परिवर्तनकारी ताकदीच्याही कहाण्याही सांगतात.यात चिवटपणे झुंजणाऱ्या व्यक्ती व समुदाय आहेत, आणि त्यांनी दडपशाहीविरोधात केलेला असामान्य प्रतिकारही आहे.रॉय यांनी त्यांच्या विलक्षण आयुष्यातून शिकलेला एक महत्त्वाचा धडा या पुस्तकात नोंदवला आहे गरिबी, भेदभाव, विषमता किंवा भ्रष्टाचार, असा कोणताही प्रश्न असेल तरी त्याचे पडसाद व्यक्तिगत व राजकीय अशा दोन्ही अवकाशांमध्ये उमटत असतात. त्यामुळे व्यक्तिगत व राजकीय अवकाशांची सांगड घालूनच आपल्यातील प्रत्येक व्यक्तीला काहीएक बदल घडवणं शक्य असतं, असं त्या नमूद करतात.